कधीतरी या जग रहाटीचा खूप कंटाळा येतो.... वाटत... आपण उगीचच गुंतवून घेतोय स्वतःला... सारखी तीच ती माणस, तीच नोकरी तेच एक घर.... या सगळ्या रुटीनचा जाम वैताग येतो.. आणि मग त्या सगळ्यातून बाहेर पडायला मन धडपडू लागत.
वास्तविक मनात असा विचार येईपर्यंत ते स्वतः इतक्या जणांच्या हातात हात गुंफून चालत असत आणि पायात इतके पाय अडकलेले असतात... की त्याला त्याचे स्वतःचेच हात-पाय सापडत नाहीत. मुखवटे किती?? ते तर विचारुच नये...!! चेहऱ्यामागून चेहरे बदलत जातात. आणि खरा चेहरा, ज्याने तो कोणी एक विश्वात्मक आपल्याला ओळखत असतो तो आपल्या लक्षातच राहत नाही. एक हात सापडला तर दुसरा नाही सापडत. एक पाय सोडवू तर दुसरा गुंतून राहतो. एक चेहरा लावू जावं आणि स्वतःला निरखावं मनाच्या आरशात तर आपणच आपल्याला अनोळखी दिसू लागतो.. मग आपली खरी ओळख आपल्याला व्हायची कधी? केव्हा? कुठे?? नुसते प्रश्न आणि प्रश्न.. उत्तरांच काय..??
अशा वेळी त्या विश्वात्मकालाच साकड घालावं.. त्याचेच पाय धरावेत आणि सांगाव बाबा रे तू दिलेला माझा खरा चेहरा कधी कुठे हरवला ते कळलंच नाही. मायेच्या खेळात आनंदात न्हाताना.. मी आणि माझं जोपासताना जो खरा माझा , त्या तुला कधी स्मरलंच नाही. पण आतातरी तुझ्या सर्वसाक्षी अस्तित्वाची थोडी फार जाणीव होऊ लागलीये. मला सामावून घे तुझ्या विशाल बाहुपाशांत. माझी गेलेली ओळख परत येऊ दे. स्मृती-भ्रंश झालाय मला. भलतीकडेच लक्ष राहील आणि भलं तिकडे नजर वळलीच नाही... आता तरी मुखातून तुझं नाम येतंय.. त्या नामातून तुझं सगुण रूप माझ्या चित्तात पाझरू दे आणि तो भक्तीचा पाझर मला तुझ्या निर्गुणाकडे घेऊन जाऊदे....